Pages

  • Twitter
  • Facebook
  • Google+
  • RSS Feed

Friday, 7 November 2014



मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे आमदर दीपक केसरकार यांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. या घटनेचे पडसाद लगेचच नाशिक लोकसभा मतदार संघात उमटले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडीचा प्रचार करायचा की नाही यासाठी मंगळवारी बैठक बोलावली आहे.
नाशीक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर येथील आमदार व नारायण राणे यांचे कट्टर समर्थक माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला समर्थन द्यायचा निर्णय घेणार असल्याच जाहीर केले. याठिकाणी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे उमेदवार आहेत. कोकाटेंच्याा या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळत नसल्याचे काही ठिकाणी लक्षात आले आहे. नाशिक जिल्ह़यात भुजबळ आमचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कोकाटे यांनी या आधीही केला होता. मात्र आता सिंधुदुर्गच्या वादाची किनार लाभल्याने भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे हे मंगळवारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात जया बच्चन यांनी शाहरुखचा चित्रपट ‘हॅप्पी न्यू इअर’ला बकवास असल्याचे वक्तव्य केले होते. ‘हॅप्पी न्यू इअर’ सध्या पाहिलेल्या सगळ्या चित्रपटात सर्वात मूर्ख चित्रपट आहे. याच चित्रपटात जया यांच्या मुलाने म्हणजेच अभिषेकने ही काम केले आहे. पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागली आहे.
केवळ अभिषेकमुळेच आपण हा सिनेमा पाहिल्याचंही जया यांनी प्रांजळपणे कबुली दिली होती. आपली ही प्रतिक्रिया त्यांनी शाहरुखसमोरही उघडपणे व्यक्त केली होती. पण, हेच मत त्यांनी जेव्हा सार्वजनिकपणे मांडले तेव्हा अमिताभ बच्चन यांना शाहरुखला एक एसएमएस पाठवावा लागला.
या एसएमएसमध्ये त्यांनी आपल्या पत्नीतर्फे शाहरुखला माफी मागितली आहे. जया यांचा हेतून शाहरुख किंवा त्याच्या चित्रपटाचा अपमान करण्याचा नव्हता, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता सलमान खानने नवी दिल्लीत भेट घेतली. सलमान खानने पंतप्रधानांची भेट बहीण अर्पिता खान हिच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी घेतल्याचे सांगितले जात आहे. यावेळी सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा अग्निहोत्रीसुद्धा उपस्थित होती.
येत्या १८ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये अर्पिता खानचे लग्न दिल्ली स्थित आयुषसोबत होणार आहे. अर्पिता सलीम खान आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे.
सलमानने यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दर्शवत हातात झाडू घेऊन कर्जत येथे साफसफाई केली होती. पंतप्रधानांच्या या अभियानाचे त्याने कौतुकही केले होते. याशिवाय गुजराज काइट फेस्टिव्हलवेळी दोघांची भेट झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

२०१४ मध्ये ‘हॉलिडे’ आणि ‘एंटरटेन्मेंट’सारखे दोन हिट चित्रपट दिल्यानंतर आज बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. १९८२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शौकीन’चा रिमेक ‘द शौकीन’ आज बॉक्स ऑफिसवर झळकला आहे. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल की २०१४ हे वर्ष अक्षयसाठी भरभराटीचे गेले आहे.
तर चित्रपटाची कथा सुरु होते तो तीन वयस्कर मित्रांपासून जे आहेत लाली (अनुपम खेर), केडी (अन्नू कपूर), आणि पिंकी (पियूष मिश्रा). हे तीन वयस्कर असून देखील त्यांची मने एखाद्या लहान मुलासारखी आहेत. हे तिघे जिथे जातील तेथे आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणींचे निरिक्षण करतात. या तिघांच्या कृत्याची तरुणींना जेव्हा जाणीव होते, तेव्हा तिघेही दिल्ली सोडून मॉरिशसला जायचे ठरवतात. मॉरिशसमध्ये हे तिघे अहाना (लीसा हेडन) हिच्याकडे भाड्याने राहतात. अहाना हि खूप मनमोकळी स्वभावाची असते. सुपरस्टार अक्षय कुमारला भेटण्याचे तिचे स्वप्न आहे. आपल्या स्वप्नाची कल्पना अहाना लाली, केडी आणि पिंकी यांना देते आणि एक अट ठेवते की जो कोणी माझी अक्षयशी भेट घालून देईल त्याच्यासाठी मी काहीही करीन आणि येथूनच सुरुवात होते मुख्य चित्रपटाला अक्षय भेटीचा आटापिटा आणि कॉमेडीचा तडका. चित्रपटात पुढे काय होते, हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावे लागेल.
अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियूष मिश्रा यांनी आपण वयानेच नव्हे तर अभिनयानेसुध्दा दिग्गज असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. अक्षयविषयी बोलायचे झाले तर तो पुन्हा एकदा खिलाडी ठरला आहे. परंतु लीसाचा अभिनय सुमारच झाला आहे. १९८१च्या ‘शौकीन’च्या आधारावर दिग्दर्शक अभिषेक शर्माने ‘द शौकीन’ बनवला असून चित्रपटात तसे विशेष काही नाही. पण चित्रपटातील कॉमेडी सीन्स पैसा वसूल करतात.
ज्या चित्रपटात अक्षय कुमार सारखा खिलाडी असेल त्या चित्रपटात मनोरंजन खचखचून भरलेले असते. हा चित्रपट फक्त मनोरंजन आणि मनोरंजन हे ब्रीद लक्षात ठेऊनच बनवला गेला आहे.
वाशीम – सायखेडा येथील संगीता आव्हाळे या महिलेने काही दिवसांपूर्वीच आपले मंगळसूत्र विकून शौचालय बांधले. तिच्या ह्या गोष्टीची दखल घेत त्यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला परंतु आता संगीता आव्हाळे या वाशीम जिल्ह्यातील संपूर्ण स्वच्छता अभियानाची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ होणार आहे. १० नोव्हेंबरला त्याची घोषणा होईल. सरकारकडून शौचालयासाठी ४,६०० रुपये अनुदान दिले जाते. संगीता यांच्या निर्णयानंतर शासनाने त्यात वाढ केली असून, आता १२,००० रुपये अनुदान मिळेल.

पणजी – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेण्याआधीच उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी सीएमपदावर दावा ठोकला असून आपण कनिष्ठ व्यक्तींच्या हाताखाली काम करणार नाही, असे म्हणत राजीनामा देण्याचाही इशारा त्यांनी दिला. डिसुझा हे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा कनिष्ठ या अर्थाने संदर्भ देत होते.
रविवारी दुपारी एक वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यात चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांचा समावेश होईल. त्याबाबत त्यांना पीएमओतून दूरध्वनीही आला. गडकरींनी त्यांना दिल्लीत बोलावून अभिनंदन व सत्कारही केला. संपुआ सरकारने केलेला कोळसा घोटाळा उघडकीस आणल्याने खा. अहिर यांना देश ओळखायला लागला. तर भाजपमध्येही त्यांनी या प्रकरणामुळे आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

वाराणसी : सध्या वाराणसी मतदारसंघाच्या दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांनी आज सकाळी वाराणसीच्या अस्सी घाटावर स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात करत साफसफाई केली.
अस्सी घाटावर साफसफाई केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्याभरात हा घाट पूर्णपणे स्वच्छ होईल, अशी आशा व्यक्त केली. याचबरोबर वाराणसीतल्या सामाजिक संस्थांनी तीन महिन्यामध्ये अस्सी घाट स्वच्छ करण्याचे वचन देखील दिले आहे. आज मोदी यांच्या हस्ते वाराणसी शहरात स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे अनावरण होणार आहे. तसेच आनंदमयी आश्रम आणि रूग्णालयालाही ते भेट देणार आहेत.
मोदींनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यासाठी त्यांनी नऊ जणांची निवड केली असून यात राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह रामभद्राचार्य, मनोज तिवारी, मनुज शर्मा, मोहम्मद कैफ, प्रा. देवीप्रसाद द्विवेदी, राजू श्रीवास्तव, सुरेश रैना, कैलाश खेर यांचा समावेश आहे.
दुबई – श्रीलंके विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने सहज विजय मिळविल्याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रॅकिंगमध्ये भारताने पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताने कोच्ची आणि अहमदाबाद येथील सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ११५ गुण जमा झाले आहेत. याक्षणी भारत व दक्षिण आफ्रिका या संघांचे प्रत्येकी ११५ गुण झाले आहेत.

मुंबई – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात सध्या सुरू असलेले टोलनाके पूर्णपणे बंद करणे अशक्य असल्याची कबुली दिली. सध्या टोलनाके सरसकट बंद करणे हे सरकारला परवडणारे नसल्यामुळे टोलवसुलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले होते. परंतु, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्व टोलनाके बंद करणे शक्य नसल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जे टोल आहेत ते तसेच सुरू राहतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात दिली.
टोलच्या धोरणाचा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आढावा घेतला. मुदत संपत आलेले किती टोलनाके बंद करता येऊ शकतात. हे टोलनाके बंद करण्यासाठी किती आर्थिक तरतूद लागेल याची माहिती आठवडाभरात सादर करण्याची सूचना पाटील यांनी अधिका-यांना केली.

मुंबई : भारतीय बाजारात लक्झरी कार बनवणाऱ्या ब्रिटनच्या रोल्स रॉयसने ‘घोस्ट सीरिज-२’ सादर केली असून या नव्या कारची किंमत ४.५० कोटी रुपये आहे.
रोल्स रॉयस एशिया पॅसिफिकचे संचालक स्वेन जे रिटर यांनी रोल्स रॉयससाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ असून सर्वोत्तम कारच्या चाहत्यांसाठी ‘घोस्ट सीरिज-२’ सादर करताना आम्हाला आनंद होत असून घोस्ट मॉडेल एशिया पॅसिफिक क्षेत्रातील पाच बाजारात अतिशय पसंत केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.
२००५मध्ये भारतात आलेल्या रोल्स रॉयसचे आजमितीस तीन मॉडेल उपलब्ध असून यामध्ये फॅण्टम, घोस्ट आणि रॅथ यांचा समावेश आहे. कंपनी देशभरातील पाच डिलरच्या माध्यमातून या कारची विक्री करते. घोस्ट पहिल्यांदा २००९मध्ये भारतात सादर करण्यात आली असून कंपनीने २००५ पासून आतापर्यंत तीन माडेल्समधील २५० कारची विक्री केली आहे.

इंदोर – भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने देखील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवून आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली आहे. पण याचे लोकार्पण कधी होणार यावर अनिश्चितता कायम आहे.
इंदोरमध्ये एका मुलींच्या महाविद्यालयात संपन्न झालेल्या ‘सानिया की पाठशाला’ कार्यक्रमा दरम्यान तिने सांगितले की मी माझ्या आत्मचरित्राचे २५-२६ अध्याय लिहिले आहेत. मी जसजशी मोठी झाली त्याप्रमाणे माझ्या या आत्मचरित्रात अध्याय जोडले जात आहेत आणि आता मला याचे लोकार्पण केव्हा करायचे हे ठरवायचे आहे.
त्याचप्रमाणे आजवर इतरांनी आपल्यावर खूप काही लिहिले आहे, त्यात काही सत्य आहे तर काही खोटे त्यामुळे मी असा विचार केला की मीच माझ्याबाबतीत घडलेल्या अनुभवांचा उलगडा लोकांसमोर आत्मचरित्राच्या माध्यमातून ठेवणार आहे.
 
© 2012. Design by Main-Blogger - Blogger Template and Blogging Stuff